कालका-हावडा एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.आज (मंगळवारी) पहाटे दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गावर कुरुक्षेत्र येथील धीरपूर गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले आहेत. आग लागताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. जखमींमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. काही प्रवाशांनी आग लागल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. कालका येथून दिल्लीकडे ही एक्सप्रेस जात होती. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रेनच्या पुढील डब्ब्याला ही आग लागल्याचं समजतंय. ट्रेनमध्ये आग लागल्याचं समजताच रेल्वे पोलीस, बचाव पथक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.