सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून या पुराचा फटका भूतान आणि अरुणाचल प्रदेशमधील १३ जिल्ह्य़ांतील तीन लाख लोकांना बसला आहे. तसेच काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

धेमाजी, लखिमपूर, कोक्राझार, बोंगाईगाव, चिरंग, बारपेटा, जोरहाट, बासका, सोनितपूर आणि दिब्रुगड या जिल्ह्य़ांत ब्रह्मपुत्रा नदीची पाणीपातळी वाढली आहे. तर नालबारी, सिवसागर आणि तिनसुकीया या जिल्ह्य़ांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
नेमातीघाट आणि दिब्रुगड या भागात ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून इतर जिल्ह्य़ांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्येही पुराचे पाणी गेल्याने वन्य प्राण्यांना डोंगराळ भागात हलविण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ उद्यान अधिकाऱ्याने दिली. पुराच्या पाण्यामुळे उद्यानाच्या बुरापहर या दक्षिण भागात मोठय़ा प्रमाणात पाणी गेले असले तरी वन्य प्राण्यांच्या जीविताला कुठलाही धोका नसल्याचेही वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोक्राझार, बोंगाईगाव, बारपेटा, मोरीगाव, सोहितपूर आणि नालबारी या जिल्ह्य़ांमधील अन्य नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. या पुराचा फटका ६११ गावांमधील तीन लाख लोकांना बसला आहे. पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाने १२४ मदत केंद्रे सुरू केली आहेत. या मदत केंद्रांमध्ये एक लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. पुराच्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली गेली आहे. तसेच, पूल आणि रस्त्यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आसाममधील पुरात आतापर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.