उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज - लखनऊ महामार्गावर काल(गुरुवार) रात्री उशीरा ट्रक व वर्हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये सहा अल्पवयीन मुलांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की जीप पूर्णपणे ट्रकमध्ये घुसली होती व तिचा चुराडा झाला होता. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या वर्हाडी मंडळीवर काळाने घाला घातल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जीप चालकास डुलकी आल्याने भरधाव वेगातील जीप रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही सर्व वर्हाडी मंडळी शेखपुर गावातील लग्न समारंभ आटोपून घराकडे परतत होती. जीप अत्यंत भरधाव वेगात ट्रकमध्ये घुसली की, नंतर कटरच्या सहाय्याने तिचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावी लागली. पोलिसांना यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. Pratapgarh: Fourteen persons including six children died after the vehicle they were travelling in collided with a truck on Prayagraj-Lucknow highway under limits of Manikpur police station last night. pic.twitter.com/2WOFMUyO8Z — ANI UP (@ANINewsUP) November 20, 2020 सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. शिवाय,वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचेही निर्देश दिले आहेत.