राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीचे सदस्य राहुल गांधी यांचे कोणतेही आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नाही असंही गुहा यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी महान पक्ष असलेला काँग्रेस हा आज दयनीय घराणेशाही कंपनी झाला आहे. भारतात अंधराष्ट्रीयता वाढीला लागल्याने हे घडलं आहे असंही गुहा यांनी म्हटलंय. राष्ट्रभक्ती विरोधात अंधराष्ट्रभक्ती या विषयावर इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे व्याख्यान केरळ साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“व्यक्तीगत पातळीवर माझं राहुल गांधी यांच्यासोबत कोणतंही शत्रुत्व नाही. ते एक शांत आणि सभ्य व्यक्ती आहेत. मात्र सध्याची तरुणाई घराणेशाहीला कंटाळली आहे. त्यांना गांधी घराण्याची पाचवी पिढी नको आहे. जर 2024 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा राहुल गांधींनाच निवडून देण्याची चूक केलीतर तर त्याचा फायदा कदाचित नरेंद्र मोदींनाच होईल. भारताच्या जडणघडणीत केरळचं योगदान मोठं आहे. मात्र राहुल गांधींना निवडण्याचा निर्णय विनाशकारी होता”