राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्य सरकारच्या अधिपत्याखालील मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.

थोरात म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे. इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भारतीय जनता पक्षाचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतू भाजपाला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपाला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे.

दिवाळीनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार असताना पाकिस्तानातून आयात करण्याची गरजच काय? पाकिस्तानबद्दल कोणीही काही बोलले की लगेच त्याला पाकिस्तानसमर्थक ठरवून अगदी देशद्रोह्याचा शिक्का मारण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपा व त्यांच्या समर्थकांनी लावलेला आहे. नेहमी पाकिस्तानच्या नावाने ओरडणाऱ्या भाजपाला पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो? यातून भाजपा कसले देशप्रेम सिद्ध करत आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. पाकिस्तानचा कांदा आणून आपल्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी थोरात यांनी केला.