बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टि्वटच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

“मला आज प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वयैक्तीक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं.