देशभरात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असल्याने, सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. नुकतंच हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीने सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!” असं जलील यांनी ट्विट केलं असून, सोबत कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी; करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन

तसेच, “जर माझ्या शेजारचे छोटे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला जात असेल तर विमानतळांवरील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे का सुरू आहेत? नुकतीच मुंबई विमानतळावर ग्राहकांसह सर्व दुकाने सुरू असल्याचं पाहिलं!” असं देखील जलील यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चिंतेत भर! कुंभमेळ्यात १०२ भाविक निघाले करोना पॉझिटिव्ह

राज्यातील संभाव्य लॉकडाउनबाबात देखील खासदार जलील यांनी टीका केली होती. हे नेत गरिबांच्या हिताचा निर्णय घेणार नाहीत,त्यामुळे आता गरिबांनाच स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल, लढावं लागेल. असं जलील यांनी म्हटलं होतं. त्यांनी औरंगाबादमधील लॉकडाउनच्या निर्णयाला देखील जोरदार विरोध दर्शवला होता.