भारत आणि चिनी सैन्यांमध्ये सध्या लडाखमधील नियंत्रण रेषेवरुन तणाव सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीही भारतीय लष्कराने माणुसकी दाखवली आहे. भारतीय जवानांनी ३१ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये नियंत्रण रेषा पार केलेल्या भरकटलेल्या जनावरांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवलं आहे. यामध्ये १३ याक आणि चार वासरं होती. भारतीय लष्कराने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “भारतीय लष्कराने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नियंत्रण रेषा पार करुन आलेल्या भरकटलेल्या १३ याक आणि चार वासरांना ७ सप्टेंबर रोजी चीनकडे परत सोपवलं आहे. चिनी अधिकाऱ्यांनी याबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत”.

महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी भारतीय आणि चिनी लष्कराने जवान पुन्हा एकदा लडाखमध्ये आमने-सामने आले होते. लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यांकडून हवेत गोळीबार करत भारतीय चौक्यांजवळ येण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय लष्कराने सांगितलं आहे. चिनी सैन्यांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु असतानाच ही घटना घडली आहे.

यादरम्यान अरुणाचल प्रदेशात सीमारेषेवर असणाऱ्या गावामधील पाच ग्रामस्थांचं चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून अपहरण करण्यात आलं असून अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही. पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत.