भारतामध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ इतकीझाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यत ३१ लाख ७ हजार २२३ जणांनी करोनावर मात केली आहे. ८ लाख ४६ हजार ३९५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एक हजार ८९ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत देशात ६९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

सलग आठ दिवस दररोज ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. ०.५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रांवर ठेवण्यात आले आहे. ३.५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मृत्युदर १.७४ टक्के आहे. सलग दुसऱ्या दिवशी ११.७० लाखांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी दैनंदिन संसर्गदर ७.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.