‘हिंदू पाकिस्तान’बाबत केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अजून शमलेला नसताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये गाय असणं हे मुसलमान असण्यापेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं विधान थरूर यांनी केलं आहे. थरूर यांनी केलेल्या या ट्विटमुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

जातीय हिंसाचार कमी झाल्याचा भाजपाच्या मंत्र्यांचा दावा वस्तुस्थितीत खरा का नसतो. यावरून असं वाटतं की अनेक ठिकाणी गाय असणं हे मुसलमान असण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. असं ट्विट थरूर यांनी केलं असून त्यासोबत त्यांनी स्वतःचा एक लेख देखील जोडला आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावाने गो-तस्करीच्या संशयावरुन 28 वर्षीय अकबर खान यांना बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केल्यानंतर थरूर यांनी हे ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी थरूर यांनी भाजपावर टीका करताना, जर भाजपा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका जिंकली तर हा देश हिंदू-पाकिस्तान बनेल असं विधान केलं होतं.