पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्याबरोबरच मुंबईलाही लक्ष्य करु शकते. गुप्तचर यंत्रणांनी सरकारला ही माहिती दिली आहे. जैश आर्थिक महानगरी असलेल्या मुंबईला लक्ष्य करु शकते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल केले होते.

त्यापार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी सरकारला सावध केले आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान अतिरेकी गटांना प्रोत्साहन देऊ शकतो इम्रान यांच्या विधानाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. जे इनपुटस मिळाले आहेत त्या आधारावर मुंबई जैश-ए-मोहम्मदच्या रडारवर असू शकते असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे.

पाकिस्तान आपल्या स्लीपर सेलला सक्रीय करेल तसेच जैशच्या तीन जणांच्या टीमवर मुंबई हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. केंद्राने राज्य पोलिसांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.