आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी अखेर आज दुपारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर आप सरकार स्थापन करत असून निवडणुकीत सगळ्यात मोठी पार्टी ठरलेली भारतीय जनता पार्टी विरोधात बसणार आहे. केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मनीष सिसोदिया आदी सात सहका-यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.  या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाचे नेते हर्षवर्धन व शांती भूषण उपस्थित होते. दरम्यान अण्णा हजारे जरी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नसले तरी त्यांनी पत्राद्वारे केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. रामलीला मैदानावर नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपच्या मंत्र्यांना शपथ दिली.
फोटो गॅलरीः आम आदमी- अरविंद केजरीवाल
यावेळी केजरीवाल म्हणाले की,  ‘आप’चा शपथविधी हा दिल्लीकरांचा विजय आहे. जनतेची सेवा याच उद्दिष्टासाठी राजकारणात प्रवेश केला आहे.  ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही.  मात्र, सर्वजण मिळून आपण ही लढाई लढू शकतो. सर्व समस्यांचे निराकरण उद्या लगेच होण्यासाठी आमच्याकडे तोडगा नाही. आमच्याकडे काही जादूची काटी नाही. पण, दिल्लीचे दीड कोटी लोक मिळाल्यावर नक्कीच सर्व समस्यांचे निराकरण होईल आणि हेच लोक सरकार चालवतील.
दोन वर्षांपूर्वी रामलीला मैदानावर अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केले. अनेक उपोषण, आंदोलने केली. पण राजकारण बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. तेव्हा वाटले नव्हते की एवढा मोठा बदल होईल. अण्णा मला सांगत होते की, राजकारण चिखल आहे. त्यात जाऊन तुम्ही घाण व्हाल. पण मी त्यांना समजावून सांगत असे की, हा चिखल साफ करण्यासाठी त्यात उतरूनच साफ करावा लागेल. यावेळी केजरीवाल यांनी नागरिकांनाही ‘लाच घेणार नाही, देणार नाही’ अशी शपथ घेण्यास लावली. तसेच, भ्रष्ट अधिका-यांविषयी हेल्पलाईनवरून माहिती देण्याचेही आव्हान त्यांनी जनतेस केले.
शपथविधीनंतर केजरीवाल राजघाट येथे पोहोचतील.  दुपारी २ वाजता कॅबिनेटची बैठक घेण्‍यात येणार आहे.