काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाचीही सर नाही आणि स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कोणीही ‘गांधी’ होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली. सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाव रॅलीमध्ये “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यावरुन सर्व स्तरातून टीका होते आहे.