भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 41 जवान शहीद झाले होते. भारताने या दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत जवळपास 300 दहशतवाद्यांना ठार केलं. भारतीय हवाई दलाने या कारवाईचं देशवासियांनी जल्लोषात स्वागत केलं आहे.

पाकिस्तानने सुरुवातील हल्ला झाल्याचं नाकारलं होतं. मात्र जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, या ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरने भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारतीय हवाई दलाने निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा केला होता. मात्र हाफिज सईदच्या ऑडिओ क्लिपमुळे हा दावा फोल ठरला आहे.

टाइम्स नाऊने ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने मसूद अझहरचे अनेक नातेवाईक बेपत्ता असल्याची माहिती दिली असल्याचंही वृत्तात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा मारला गेला आहे. हे सर्वजण त्यावेळी दहशतवादी तळावर उपस्थित होते.

‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा’
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्ला संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानवर कारवाई केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांचा बदला भारताने घेतला त्यानंतर वायुदलाचं कौतुक होतं आहे. देशभरात जल्लोष साजरा होतो आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं म्हटलं आहे.