पीडीपीच्या बैठकीत निर्णय नाही; वादाच्या मुद्दय़ांबाबत भाजपकडून मेहबुबांना स्पष्टीकरण हवे
जम्मू- काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावर विचार करण्यासाठी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी बोलावलेल्या बैठकीत काही निर्णय न झाल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. पीडीपीसोबतच्या युतीची उद्दिष्टे तार्किक निष्कर्षांपर्यंत पोहचवण्याबाबत भाजपने आपली खात्री पटवल्यानंतरच आपण या मुद्दय़ावर निर्णय घेऊ, असे सांगून मेहबुबा यांनी भाजपलाही प्रतीक्षा करायला लावले आहे.
यापूर्वीचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लागू असलेल्या जम्मू- काश्मीरमध्ये नव्याने निवडणुका होऊ शकतील काय, हा ‘अनुमाना’चा भाग असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
मुफ्ती यांच्या वारसदार मानल्या जाणाऱ्या मेहबुबा यांनी सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाचे खासदार, आमदार, विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांच्यासह पक्षनेत्यांची सुमारे चार तास बैठक घेतली. ‘मुफ्ती साहेबांची शांतता आणि विकासाबाबतची दूरदृष्टी पुढे कशी न्यायची’ याबद्दल बैठकीत विचार करण्यात आला. भाजपसोबत युती करण्यास उघड विरोध करणारे खासदार तारिक कारा बैठकीला हजर नव्हते. सरकार स्थापना रखडलेली नसून, ती प्रक्रिया सुरू राहील असे पक्षाचे नेते नईम अख्तर म्हणाले. मुफ्ती मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेल्या युतीचे उद्दिष्ट तार्किक निष्कर्षांपर्यंत नेले जाईल याबाबत आपली खात्री पटली की आपण सरकार स्थापण्याबाबत निर्णय घेऊ, असे मेहबुबा म्हणाल्याचे त्यांनी बैठकीची माहिती देताना सांगितले.
पीडीपी-भाजपच्या आघाडीचा उद्देश केवळ सरकार स्थापन करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर जम्मू- काश्मीरच्या इतिहासात राज्याच्या वाटय़ाला जी संकटे आली आहेत त्यातून त्याला बाहेर काढणे हेही तिचे लक्ष्य होते. परस्पर विश्वासावर आधारित असलेल्या या आघाडीमुळे भारत व पाकिस्तानदरम्यानच्या उपखंडात शांतता प्रस्थापित होईल, असा मुफ्ती यांना विश्वास होता आणि त्यामुळेच मृत्युशय्येवर असतानाही ते या दोन देशांच्या संबंधांबाबत बोलत होते, असेही मेहबुबा या बैठकीत म्हणाल्या.