पाकिस्तानच्या तपास पथकाला (जेआयटी) भारतात येण्याची परवानगी देऊन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. पाकिस्तानात भारतविरोधी दहशतवादाला आश्रय मिळत असताना त्यांच्याच सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना भारतात तपास करण्याची परवानगी कशी काय मिळू शकते, असा सवाल यावेळी केजरीवाल यांनी उपस्थित केला. पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेचा हात असून हा पाक पुरस्कृत दहशतवाद आहे, असे आपण म्हणतो. तेव्हा या भूमिकेत बदल झाला असे समजायचे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करल्याचे हे लक्षण आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.
पठाणकोट हवाई तळावर जानेवारीत झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असलेले पाकिस्तानचे पाच सदस्यांचे संयुक्त तपास पथक (जेआयटी) शनिवारी येथे येऊन पोहोचले होते. एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.