भारतावर करण्यात आलेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच असल्याचे अधोरेखित करताना यापुढे पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवाद रोखण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले तरच भारत पाकिस्तानची साथ देईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते काल जयपूर येथे सुरू असलेल्या दहशवादविरोधी परिषदेत बोलत होते. संपूर्ण जगाला दहशतवादाचा धोका लक्षात येऊनही दहशतवादाच्या एकाही व्याख्येवर अद्यापपर्यंत  एकमत झालेले नाही. काही देश दहशतवादाचा वापर परराष्ट्र धोरणातील चाल म्हणून करतात, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. यावेळी राजनाथ यांनी पाक पुरस्कृत दहशतावादावरही निशाणा साधला. भारतावरील बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे उगमस्थान पाकिस्तानच असून आतातरी या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी पाकिस्तानकडून ठोस आणि प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील दहशतवादी संघटनांवर निर्णायक कारवाई केल्यासच भारत पाकिस्तानची साथ देईल. ही बाब फक्त दोन देशांचे परस्परसंबंध सुधारण्याइतकीच महत्त्वाची नसून त्यामुळे  संपूर्ण दक्षिण आशियाई परिसरात शांतता प्रस्थापित होईल, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.