मुंबईवरील (२६/११) हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (जेयूडी) आणि फलाह-ए-इन्सानिअत फाऊंडेशन (एफआयएफ) या संघटना आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अध्याधेशानुसार या संघटनांवर बंदी आणण्याबाबतचा ठराव झाला होता. मात्र, हा ठराव रद्द झाल्याने ही बंदी उठवण्यात आली आहे, असे पाकिस्तानातील माध्यमांनी म्हटले आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी दहशतवादविरोधी कायदा, १९९७ मध्ये सुधारणा करीत जेयूडी आणि एफआयएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. दरम्यान, इस्लामाबाद हायकोर्टात यासंदर्भात सईदने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचा ठराव रद्द झाल्याने आणि तो पुढे वाढवता येणार नाही, असे म्हटले आहे. पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र डॉनने याबाबत वृत्त दिले आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद हा सुत्रधार आहे. भारताने तसे पुरावेही पाकिस्तानला सादर केले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या मागील सरकारने हाफिज सईदच्या संघटनांवर बंदी घालत सईदला नजरकैदेतही ठेवले होते. मात्र, त्यानंतर तांत्रिक कारण देत आता त्याच्या संघटनांवरील बंदी उठवण्यात आली आहे. याच वर्षी पाकिस्तानात झालेल्या सर्वत्रिक निवडणुकांमध्येही सईदच्या राजकीय पक्षाने निवडणूक लढवली होती मात्र, त्याला पाकिस्तानी जनतेने पूर्णपणे नाकारले.