थेट भाजप प्रवेशाऐवजी ‘मित्र’ म्हणून बाहेर राहण्यावर दिल्लीतील चर्चेत शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छुपा प्रतिरोध आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी दिलेला थंडा प्रतिसाद पाहता, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचा नाद सोडून दिला असल्याचा दावा एका महत्त्वपूर्ण नेत्याने मंगळवारी केला. ‘राणे स्वत:चा पक्ष स्थापन करतील आणि अधिकृतपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) प्रवेश करतील,’ अशी माहितीही त्या नेत्याने दिली. ‘राणे यांना भाजपमध्ये घेण्यास अनेकांचा विरोध आहे. स्वत: मुख्यमंत्री अनुकूल नाहीत. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत शहांनीसुद्धा राणेंना फारसा प्रतिसाद दिला नाही. साधा पक्षप्रवेशाचा विषयही काढला नाही. अशा स्थितीत थेट प्रवेशाचा मुद्दा जवळपास निकालात निघाल्याचे गृहीत धरावे लागेल. स्वत:चा पक्ष स्थापून 'एनडीए'मध्ये जाण्याचा मार्ग राणेंकडे आहे. बहुतेक तसेच होण्याची दाट शक्यता आहे,’ असे त्या नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. आणखी एका गोष्टीकडे त्याने लक्ष वेधले. ‘दसऱ्यापूर्वीच निर्णय जाहीर करणार असल्याचे राणेंनी घोषित केले आहे. जर ते भाजपमध्ये येणार असल्यास त्याची घोषणा राणे नव्हे, तर भाजप करेल. पण ज्याअर्थी राणेंनी स्वत: घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे, त्यावरून पक्ष काढणार असल्याचा अर्थ सहजपणे निघतो,’ असेही तो नेता म्हणाला. शहांच्या ‘उघड’ भेटीने राणे भाजपच्या आणखी जवळ? केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, राज्यातील मंत्री महादेवराव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टींपासून बाहेर निघालेले मंत्री सदाभाऊ खोत यांचा नवा पक्ष आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष सध्या भाजपसोबत आहेत. त्याच धर्तीवर राणेंचा पक्ष भाजपबरोबर आघाडी करू शकतो, असे सुचवीत त्या नेत्याने आठवलेंना भाजपने राज्यसभेवर व नंतर केंद्रीय मंत्री, जानकर व खोत यांना मंत्री, मेटेंना आमदारकी व मंत्रिपदाचा दर्जा दिल्याकडे लक्ष वेधले. राणेंना असेच 'अॅडजस्ट' केले जाऊ शकत असल्याची टिप्पणीही त्याने केली. जेव्हा भाजपच्या बडय़ा नेत्याने 'अधिकारवाणी'ने राणेंची तुलना गुजरातमधील काँग्रेस बंडखोर नेते शंकरसिंह वाघेलांशी केली होती, तेव्हाच राणेंच्या प्रवेशाबद्दल साशंकता वाढली होती. ‘वाघेला काँग्रेसमधून बाहेर पडलेत; पण त्यांना भाजपने पक्षात घेतलेले नाही. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. आमच्यात सहकार्य मात्र आहे,’ असे तेव्हा तो नेता म्हणाला होता. त्यानंतर दुसऱ्या बडय़ा नेत्यानेही राणेंच्या मुलांच्या 'प्रतापा'वर प्रतिकूल टिप्पणी केली होती. ‘राणे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची उपयुक्तता नक्कीच आहे. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षामध्ये घ्यावे लागेल. एकावर दोन मोफत घेण्यासारखा प्रकार आहे. त्या दोन्ही मुलांचे प्रताप पाहता, ते आमच्या पक्षामध्ये कितपत फिट्ट बसतील सांगता येत नाही,’ असे त्या नेत्याने सांगितले होते.