नरेंद्र मोदीं विषयी भविष्यातील भूमिका स्पष्ट न करून भाजप आम्हाला मजबूरीने आघाडी संपविण्यास भाग पाडत आहे. असा आरोप करत जद(संयुक्त)चे वरिष्ट नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, नरेंद्र मोदी, एक फूटपाडू उन्मत्त व्यक्ती असून, आघाडी मधून बाहेर पडण्याच्या घोषणेची आता फक्त औपचारिकता बाकी आहे.
भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आणि बैठकीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला.
सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता नसलेले मोदी अतिशय ‘उन्मत्त’ आणि ‘फूट पाडणारे व्यक्तीमत्त्व’ असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
“भाजपकडून आम्ही मोदी २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत, असे आश्वासन मिळण्याची वाट पाहत आहोत. तसे आश्वासन मिळाले असते, तर आघाडी मधील फूट टळली असती. मात्र, भाजपकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही.”, असे तिवारी म्हणाले.
मोदींबद्दल जद(संयुक्त)ची भूमिका ठाम असून, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत झाल्यावर आघाडीमधून बाहेरपडण्याची घोषणा करण्यात येईल. “जद(संयुक्त)सारखा धर्मनिरपेक्ष पक्ष मोदीं सारख्या ‘उन्मत्त आणि फूटपाडू व्यक्तीची’ पंतप्रधानपदासाठी कशी काय पाठराखण करू शकतो?”, असा प्रश्न तिवारी यांनी केला.