माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यास यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने भाजपच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.
पंतप्रधानपद भूषविलेल्या व्यक्तीला भारतरत्नसारख्या किताबाने सन्मानित करण्याची सुरुवात केली तर या किताबासाठी लांबलचक रांग लागेल, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि केंद्रीयमंत्री तारिक अन्वर यांनी म्हटले आहे.
वायपेयी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे, मात्र त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही, असेही अन्वर यांनी म्हटले आहे. राममनोहर लोहिया आणि कर्पूरी ठाकूर यांना सदर किताबाने सन्मानित करणे योग्य आहे का, असे विचारले असता अन्वर म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा किताब देण्यास सुरुवात झाली तर त्यासाठी लागणाऱ्या रांगेला अंतच राहणार नाही.