भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून त्याविरोधात लढा देण्यासाठी युपीए सरकारने सर्वाधिक काम केल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. दिल्लीत फिक्कीच्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
भ्रष्टाचार ही सर्वात मोठी समस्या असून देशातील जनता त्यामुळे त्रस्त झाल्याचेही ते म्हणाले. हे स्वीकारार्ह नसल्याचेही त्यांनी सांगितले. युपीए सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला असला तरी इतर कोणत्याही सरकारपेक्षा युपीएने भ्रष्टाचाराशी जास्त लढा दिल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठीच युपीए सरकारने लोकपाल विधेयक पारीत केल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला षटकार मारता आला नाही. परंतु, आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळेल. आम्‍ही काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्‍याचा फायदा निश्चितच होईल. आम्‍ही आणखी सक्षम होऊन आगामी निवडणूक लढवू.
राहुल गांधी म्‍हणाले, की शिक्षणाच्‍या क्षेत्रात प्रचंड काम करण्‍याची गरज असून तरुणांना रोजगार देणे महत्त्वाचे आहे. उत्‍पादन क्षेत्रावर जास्‍तीत जास्‍त भर देण्‍याची गरज आहे. यासाठी राजकीय इच्‍छाशक्तीची गरज असून हे करावेच लागेल.