देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे. भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून करोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.

पहिल्यांदाच न्यूझीलंडने अशाप्रकारे कोणत्याही देशातून स्वत:च्या देशात परतणाऱ्या नागरिकांवर बंधने घातली आहेत. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. असं असलं तरी भारतातून न्यूझीलंडला येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढील निर्णय तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट

बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार,  २८ व्या दिवशीही वाढीचा कल कायम असून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ४७३ झाली आहे. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या ६.५९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा खाली घसरला असून ९२.११ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ फेब्रुवारीला १ लाख ३५ हजार ९२६ होती. ते प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के होईल. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ झाली आहे. मृतांचा दर कमी होऊन तो १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.