बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए आणि महाआघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाआघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे.
“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या ७० वर्षात बिहारची जी अधोगती झाली, त्याची किंमत आम्ही चुकवतोय” असे जनता दल युनायटेचे नेते के.सी.त्यागी म्हणाले.
आणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”
भाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा जेडीयूपेक्षा बराच पुढे आहे. जेडीयूच्या खराब प्रदर्शनाचा एनडीएला फटका बसला आहे. नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा सत्तेसाठी बिहारच्या जनतेकडे कौल मागितला होता. नितीश कुमार यांना नोकऱ्या, करोना व्हायरसची हाताळणी, स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न या मुद्यांवरुन जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.