काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना नव्याने सुट्टया मिळणार नाहीत. काश्मीरमध्ये मोठया संख्येने जवानांची तैनाती करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये चिंता, भितीचे वातावरण आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रेकरुंना तात्काळ काश्मीर सोडण्यास सांगितले आहे.

काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना नव्याने सुट्टया मिळणार नाहीत तसेच जे सुट्टीवर आहेत त्यांना माघारी बोलवण्यात येईल असे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका हे काश्मीरमध्ये जवानांची संख्या वाढवण्यामागचे मुख्य कारण असल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाचे म्हणणे आहे.

काश्मीरमध्ये शांतता पाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी राज्यातील राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. राज्यपाल मलिक यांनी मेहबूबा मुफ्ती, शाह फैझल, सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांची भेट घेतली.

जम्मू-काश्मीर प्रशासनाने अॅडव्हायजरी जारी केल्यानंतर खोऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भिती दूर करण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यासाठी या नेत्यांनी राज्यपालांशी संपर्क साधला होता. जम्मू-काश्मीर प्रशासनाने शुक्रवारी अमरनाथ यात्रेकरुंसाठी सुरक्षा अॅ्डव्हायजरी जारी केली. खोऱ्यात दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्यामुळे अमरनाथ यात्रेकरुंना तातडीने काश्मीर सोडण्याच्या सूचना केल्या.