सिक्किम सीमेवरील डोक्लाम वादावरुन चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. आतापर्यंत चीनने खूप संयम दाखवला. मात्र सहनशीलतेचीही एक सीमा असते, अशा शब्दांमध्ये चीनने भारताला धमकी दिली आहे. ‘आतापर्यंत आम्ही डोक्लाम प्रश्नावर अतिशय चांगुलपणा दाखवला. मात्र आता भारताने संयमाचा अंत पाहू नये,’ असे म्हणत चीनने पुन्हा एकदा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने योग्य पावले उचलावीत,’ असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुआकियांग यांनी म्हटले आहे. ‘जेव्हापासून डोक्लाम वादाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच चीनने अतिशय चांगुलपणा दाखवला. डोक्लाम प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी चीनकडून कुटनितीचाही वापर करण्यात आला आहे. द्विवपक्षीय संबंध सलोख्याचे राहावेत यासाठी चिनी सैन्याने आतापर्यंत खूप संयम बाळगला आहे. मात्र संयमाचीदेखील काही सीमा असते,’ अशा शब्दांमध्ये गुनकियांग यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे.

डोक्लाम प्रश्नावर वेळकाढूपणा करणाऱ्या भारताने आपल्या भ्रमातून लवकर बाहेर यावे, असेदेखील गुनकियांग यांनी पुढे बोलताना म्हटले. ‘चिनी सैन्याच्या क्षमतेवर, संरक्षण सिद्धतेवर कोणत्याही देशाने शंका बाळगू नये. चिनी सैन्याच्या शौर्याला कमी लेखण्याची चूक कोणत्याही देशाने करु नये. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला चिनी सैन्य मागेपुढे पाहणार नाही,’ असेही त्यांनी म्हटले.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चिनी सुरक्षा सल्लागारांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली. यानंतर कालच (गुरुवारी) परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी डोक्लाम प्रश्नावर राज्यसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. चीनशी युद्ध हा डोक्लाम प्रश्नावरील उपाय असू शकत नाही, असे स्वराज यांनी राज्यसभेत म्हटले. ‘युद्धामुळे प्रश्न सुटत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच मार्ग काढावा लागतो,’ असेही त्यांनी सांगितले.

भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाम या वादग्रस्त भागात चिनी लष्कराकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. चिनी लष्कराच्या या रस्ते निर्मितीला भारताने विरोध केला आहे. डोक्लाममधील वादग्रस्त भागावर चीन आणि भूतानने दावा केला आहे. या भागातून सैन्य मागे घेण्यासाठी चीनकडून वारंवार भारतावर दबाव टाकण्यात येतो आहे. मात्र भारतीय लष्कराचे जवान या भागात पाय रोवून उभे आहेत. भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने डोक्लामचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने भारतीय लष्कराने या भागातून मागे हटण्यास नकार दिला आहे.