२२ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे. जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले होते. चकमकीनंतर दहशतवाद्यांनी भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मात्र, या चकमकीनंतर घटनास्थळावरून काही वस्तू भारतीय लष्कराच्या हाती लागल्या आहेत. यावरून या सर्व कृत्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग असल्याचे सिद्ध होत आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या उत्तर विभागाच्या प्रमुखांनी दिली. माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले. पळ काढताना दहशतवाद्यांनी एक जवानाच्या मृतदेहाची विटंबनाही केली. त्यानंतर भारतीय सैन्याने या परिसराची तपासणी केली असता याठिकाणी पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाचे चिन्ह असलेल्या खाण्याच्या वस्तू आणि काही उपकरणे आढळून आली. अशाप्रकारची अमेरिकन सामुग्री पाकिस्तानी सैन्यातील जवान वापरतात. या पुराव्यांमुळे भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळापासून माछिल सेक्टर हा दहशतवाद्यांसाठी भारतात घुसखोरी करण्याचा सोपा मार्ग असल्याचे दिसून आले आहे. नियंत्रण रेषेपलीकडून काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा सर्वात लहान आणि सुरक्षित मार्ग म्हणून माछिल सेक्टर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सीमारेषेवर पाकिस्तानविरोधात जोरदार प्रतिहल्ले करण्यास सुरूवात केली होती. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे तीन सैनिक मारत मंगळवारी तीन जवानांच्या हौताम्याचा बदला घेतला होता. याशिवाय भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या एका बड्या अधिकाऱ्याचादेखील खात्मा केला होता. भारताच्या या प्रतिहल्ल्यांना घाबरून पाकिस्तानने गोळीबार थांबविण्याची विनंती केली होती. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानकडून सीमेवरील गोळीबार थांबवा, अशी विनंती करणारा दुरध्वनी आला असल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली होती.