शस्त्रसंधीच्या करारानंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्य़ातील ताबारेषेवरील भारतीय जवानांच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. या वेळी भारतीय जवानांनीही पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सैन्याकडून कृष्णघाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आल्याचे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच बालकोट भागातील काही चौक्यांवरही जोरदार गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानने सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या रेंजर्स आणि भारताच्या बीएसएफ अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या दोन वर्षांच्या शस्त्रसंधी समझोत्यानंतर दोन वेळा पाकने गोळीबार केला आहे. रविवारी झालेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात भारताचा एक अधिकारी शहीद झाला होता.