“विकासाला प्राधान्य देऊन सर्वांनी सोबत मिळून काम केलं, तर कोणतंही लक्ष्य अवघड नाही. कोच्ची-मंगळुरू गॅस पाईपलाईन याचं मोठं उदाहरण आहे,” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्राने सोबत करण्याचं आवाहन केलं. कोच्ची-मंगळुरू गॅस पाईपलाईनचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी देशात CNGचं जाळं दुप्पट करण्याची घोषणाही मोदींनी केली.

कर्नाटक-केरळ या दोन राज्यांना जोडणाऱ्या कोच्ची-मंगळुरू गॅस पाईपलाई पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार मोदींनी योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदी म्हणाले,”हा प्रकल्प पूर्ण करताना असंख्य समस्या आल्या. पण मजुरांनी, अभियंत्यांनी, शेतकऱ्यांनी आणि राज्य सरकारांनी केलेल्या सहकार्यामुळे हे काम पूर्ण झालं. म्हटलं तर ही फक्त पाईपलाईन आहे पण, दोन्ही राज्यांच्या विकासात याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ४५० किमी लांब कोच्ची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाईपलाइन देशाला अर्पण करताना मला अभिमानास्पद वाटत आहे. ही पाईपलाईन जीवनमान उंचावण्यासाठी मदत करेल,” असं मोदी म्हणाले.

“ही पाईपलाईन दोन्ही राज्यातील गरीब, मध्यमवर्गीय आणि उद्योजकांचा खर्च कमी करेल. या पाईपलाइन काम सुरू असताना १२ लाखांपेक्षा अधिक दिवसांची रोजगार निर्मिती झाली. ही पाईपलाईन शहरांमधील गॅस वितरण प्रणालीचं माध्यम बनेल. त्यामुळे सीएनजी वितरण अधिक विकसित होईल. देशात आंतरराज्य नॅचरल गॅस पाईपलाईन कमिशन १९८८मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर १०१४ पर्यंत म्हणजे २७ वर्षांच्या काळात भारतात १५००० किमी गॅस पाईपलाईन तयार करण्यात आली,” असं मोदी यांनी सांगितलं.

आणखी वाचा- संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“२०१४ पर्यंत देशात १४ कोटी एलपीजी कनेक्शन होते. मागील सहा वर्षांच्या काळात इतकेच नवीन कनेक्शन देण्यात आले. उज्ज्वला योजनेमुळे ८ कोटी कुटुंबांपर्यंत गॅस पोहोचला आहे. २०१४ पर्यंत देशात फक्त २५ लाख पीएनजी कनेक्शन होते. आज देशात ७२ लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये गॅस पाईपलाईन पोहोचली आहे. कोच्ची-मंगळुरू पाईपलाईनचा २१ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पीएनजी सेवेचा लाभ मिळणार आहे. आज देशाच्या सर्व भागांमध्ये १६ हजार किमी लांबीची गॅस पाईपलाईन उभारण्याचं काम सुरू आहे. जितकं काम २७ वर्षात झालं, त्याच्या निम्म्या कालावधीत आम्ही त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. CNG स्टेशनची संख्याही वाढणार आहोत,” असं सांगत मोदींना देशात CNGचं जाळं दुप्पट करण्याचा विश्वास व्यक्त केला.