पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या चेक पोस्टचे उद्घाटन केले. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी शीख समुदायासाठी सरकार मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली. आपल्या भाषणामध्ये त्यांनी जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० चाही उल्लेख केला. कलम ३७० रद्द केल्याने तेथील शीख समुदायाला याचा फायदा होईल असं मत मोदींनी व्यक्त केलं.

कर्तारपूर कॉरिडोअरच्या भारतातील चेक पोस्टचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी शीख समुदायाशी संवाद साधला. यावेळी मोदींनी  शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव य़ांची शिकवण केवळ शीख समुदायालाच नाही तर सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. शीख समुदायाच्या शिकवणीचा आज वेगवेगळ्या माध्यमातून जगभरामध्ये प्रसार केला जात असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या देशांनी जारी केलेली गुरुनानक यांची नाणी, शीख समुदायसाठी महत्वाची धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी आठवड्यातून एकदा चालवली जाणारी विशेष ट्रेन, नागपूर ते अमृतसर विमानसेवा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. याच भाषणात त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या शीख समुदायातील लोकांना कलम ३७० रद्द झाल्याने दिलासा मिळणार असल्याचेही म्हटले. “३७० हटल्याने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही शीख परिवारांनाही इतर भारतीयांप्रमाणे अधिकार मिळणार आहेत. तिथे राहणाऱ्या हजारो शीख नागरिकांना कलम ३७० संदर्भातील निर्णय़ामुळे दिलासा मिळणार आहे,” असं मोदींनी सांगितलं.

१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे. कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे.

पाकिस्तान आणि इम्रान यांचे आभार

कर्तारपूर प्रकल्पासंदर्भात वेगाने काम करणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांचे अभार मानले. “मी पाकिस्तान सरकारचे तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो. भारतीयांच्या भावना समजून त्यांनी या प्रकल्पाचे त्वरित काम केले. इतकचं नाही मी या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचेही अभिनंदन करु इच्छितो,” असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच या चेक पोस्टच्या माध्यमातून हजारो श्रद्धाळूंची सेवा केली जाईल असा विश्वासही व्यक्त केला.