पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचं आज कौतुक केलं. मोदींनी आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानाणारं भाषण दिलं. यामध्ये मोदींनी ज्योतिरादित्य यांचा उल्लेख करत आमचे माननीय खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कृषी काद्यांबद्दल सविस्तर भाष्य केल्याचं सांगितलं. त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले, अशा शब्दांमध्ये मोदींनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संसदेमधील भाषणाचं कौतुक केलं.

ससंदेच्या वरिष्ठ सदनामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला खडे बोल सुनावले. शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो. मात्र शेतकरी एखाद्या जिल्ह्याच्या, राज्याचा नाही तर संपूर्ण विश्वाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र २६ जानेवारी रोजी जे काही घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं, अशा शब्दांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेवर टीका केली.

आणखी वाचा- ‘मोदी है मौका लीजिए’ म्हणत पंतप्रधानांनी संपवलं भाषण, कारण…

पुढे बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा उल्लेख करत काँग्रेसच्याच घोषणापत्रामध्ये कृषी कायद्यांचा उल्लेख असल्याचं म्हटलं. “आज जे लोकं कृषी कायद्यांचा विरोध करत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की या देशामध्ये २०१९ साली काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये कृषी कायद्यांचा उल्लेख करण्यात आला होता. शेतकऱ्यांसोबत सरकारने नक्कीच चर्चा करायला हवी. सरकारने हे कायदे १८ महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेतला आहे. कधी काळी काँग्रेस अशा कायद्यांची वकिली करायची मात्र आता ते यालाच विरोध करत प्रश्न उपस्थित करत आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये या कायद्यांचा उल्लेख होता. शरद पवार यांनी कृषी कायद्यांसदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलं होतं. मात्र आज हेच लोकं कृषी कायद्यांना विरोध करत आहेत,” असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

आणखी वाचा- २०४७ ला जेव्हा भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करत असेल तेव्हा…; मोदींनी सांगितलं Vision 2047

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिषाण हे विश्वामध्ये नवीन आशा निर्माण करणारं आणि आत्मनिर्भर भारताची झलक दाखवणारं होतं असं म्हटलं. या भाषणामध्ये मोदींनी अनेक विषयांना हात घातला. अगदी करोनाविरुद्धची भारताच्या लढाईपासून ते कृषी कायद्यांपर्यंत आणि काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधापासून २०४७ चा भारत इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर मोदींनी आपली भूमिका भाषणामधून स्पष्ट केली.