पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भूमिका मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात एका मंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी “व्यवस्थित चौकशी केली जाईल, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, असं म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही. त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लिप्स नीट ऐकाव्या म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते, “या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. सखोल चौकशी केली जाईल. पण गेल्या काही महिन्यांपासून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. असाही प्रयत्न होता कामा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये. यामध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं.