दिल्लीचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लागते. केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमत असलेले सरकार असल्याने दिल्लीतही भाजपलाच मत द्या, अशी साद केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मतदारांना घातली आहे.
केंद्र व राज्याच्या संबंधांचा संदर्भ देत नायडू यांनी दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर आम आदमी पक्षासाठी केवळ आंदोलन करण्यासाठी जागा आरक्षित करू, असा टोला हाणला. ‘पाच साल – केजरीवाल’ या ‘आप’च्या घोषणेला ‘पाच सवाल – केजरीवाल’ असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार, २२ केंद्रीय मंत्री व १२० खासदारांचा फौजफाटा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवल्यानंतर आता दररोज एक केंद्रीय मंत्री केजरीवाल यांना पाच प्रश्न विचारणार आहे.
नायडू म्हणाले की, दिल्लीत सोळा लाख लोक राहत असलेल्या अनधिकृत वस्त्या नियमित करण्याचे श्रेय केंद्रातील भाजप सरकारचे आहे. संसदेत यासंबंधीचा कायदा मंजूर करून या वस्त्यांना अभय देण्यात आले आहे. दिल्लीची वाढती लोकसंख्या, जागेचा प्रश्न, झोपडपट्टीमुक्त दिल्ली निर्माण करण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.