देशात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज हजारो नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहे. केंद्र सरकारकडून करोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत, मात्र करोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवरच्या रणनीतीवर निशाणा साधला आहे.

“केंद्र सरकारची कोविड रणनीती – स्टेज १ – तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर टीका केली आहे.

या अगोदर देखील वेळोवेळी राहुल गांधी यांनी देशात करोनाचा संसर्ग वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर टीका केलेली आहे.

“ना ऑक्सिजन, लस देखील नाही… केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे”

“ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.

“उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या ; इव्हेंटबाजी कमी करा…”

तसेच, “३८५ दिवसातही करोनाशी लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे.

“अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी!”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

“केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

तर, करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं होतं. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं.