येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारीही सुरु आहे. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव घ्यावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

टीव्ही ९ भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान केलं आहे. या चर्चेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चर्चेदरम्यान, त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवं होतं, ज्यांना देण्यात आलेलं नाही. यावर उत्तर देताना स्वामी म्हणाले, “राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणं सरकारच्यावतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळं हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे.”

सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले, “राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती.’

“राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षांपासून पडून आहे. मात्र, त्यांनी आजवर यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. मात्र, मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे,” असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.