अयोध्येतील प्रभू राम मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या दिवशी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे.

एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

भूमिपूजनच्या दिवशी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींना रत्नजडीत पोशाख घातला जाणार आहे. रामदल सेवा ट्रस्टचे पंडित कल्कीराम हे पोशाख या मूर्तींना परिधान करतील. भूमिपूजन बुधवारी होणार आहे. त्या दिवसाचा रंग हिरवा असतो त्यामुळे प्रभू रामचंद्र हे हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसतील असं पोशाख शिवणाऱ्या भगवत प्रसाद यांनी सांगितलं.