देशात करोनाचा कहर सुरुच असून रोज लाखोंच्या संख्येनं लोकांना करोनाची लागण होत आहे. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही करोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा करोना झाल्यानंतर किती महिन्यांनी लस घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यात करोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस देण्याची सूचना देण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर करोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस करोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना करोनाची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर करोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

करोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेलेत. त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर करोनाची लस घेण्यास सांगितलं आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.

“करोनातून बरे झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देणं धोकादायक”, IMA नं दिला इशारा!

देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यूमुळे देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचला आहे.