पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देश पुन्हा एकदा सुन्न झाला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता ही धक्कादायक घटना घडली. पत्रकार गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये गौरी लंकेश यांनी भाजपविरोधात लिखाण केले होते. त्या प्रसिद्ध कवि पी. लंकेश यांच्या कन्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर राजकारणी आणि कला-साहित्य विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर ट्विटच्या माध्यमातून टीका करणे सुरू केले आहे.

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि  एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता पत्रकार गौरी लंकेश यांची त्याच पद्धतीने हत्या झाली ही बाब निषेधार्ह आहे अशा आशयाचे  ट्विट ज्येष्ठ लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी केले आहे.

पुन्हा एकदा एक क्रांतिकारी आणि सामाजिक आवाज क्रूर पद्धतीने शांत करण्यात आला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा आशयाचे ट्विट अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केले आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही गौरी लंकेश यांच्या हत्येची निंदा केली असून त्या आपल्या मनात कायम जिवंत राहतील असे म्हटले आहे. तसेच त्यांना आदरांजलीही वाहिली आहे.

क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही या हत्येचा ट्विटरवरून तीव्र निषेध केला आहे.

ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे.

गौरी लंकेश यांना अशाप्रकारे ठार केले जाणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या घटनेचा निषेध केला जावा तितका कमीच आहे अशा आशयाचे ट्विट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

गौरी लंकेश यांना ठार करण्यात आल्याची घटना मन सुन्न करणारी आहे अशा आशयाचे ट्विट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातील पत्रकारांनीही निषेध केला आहे. समाजातील एक क्रांतीकारी आवाज शांत करण्यात आला, या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर उमटू लागल्या आहेत.