शनिवारी संध्याकाळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्यात खळबळ उडाली. थेट गृहमंत्र्यांवरच पैसे वसुलीचे आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केले होते. त्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त केला. तर सोमवारी पुन्हा एकदा शरद पवारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. "ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?", असा आक्षेप शरद पवार यांनी घेतला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रावर मोठा गदारोळ झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली आहे. लोकसभेत देखील या मुद्द्यावरून भाजपाच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला मोठा पुश दिला आहे. आणखी वाचा- भाजपाला मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचाय; पंजाबमधील खासदाराचा लोकसभेत हल्लाबोल If you see the former Commissioner's letter, he mentions that in mid-February he was informed by certain officers that they got such and such instructions from Home Minister.From 6th-16th Feb, Mr Deshmuklh was admitted in the hospital because of Corona: NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/9J1PNyZ7Vr — ANI (@ANI) March 22, 2021 काय म्हणाले शरद पवार? "जर तुम्ही माजी पोलीस आयुक्तांचं पत्र पाहिलं, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचं ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात दाखल होते", असं शरद पवारांनी सांगितलं आहे. "राजीनाम्याच्या मागणीला आधार नाही" दरम्यान, विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीचा देखील शरद पवारांनी यावेळी समाचार घेतला. "हे स्पष्ट होत आहे की ज्या कालावधीसंदर्भात आरोप केले जात आहेत, त्या काळात अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे राजीनाम्याच्या मागण्यांना काहीही आधार उरत नाही", असं पवार म्हणाले आहेत.