मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या आयटी सेलने कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही केली आहे.

‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”, असं या तक्रारीत म्हटलं.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळलं. इतकंच नाही तर कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. त्यातच संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ म्हटल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळाल्याचं दिसून येत आहे.