पाकिस्तानात सन २००७ मध्ये लागू करण्यात आलेला आणीबाणीचा निर्णय घटनाबाह्य़ ठरविण्यात आल्याप्रकरणी सदर निर्णयाचा फेरविचार करण्यासंबंधी माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सदर याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक त्या वेळेची कालमर्यादा संपुष्टात आल्याचे कारण देत ही याचिका फेटाळून लावण्यात आली.सरन्यायाधीश तस्सदुक हुसेन यांच्या नेतृत्वाखालील १४ न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सदर याचिका गुणवत्तेचे निकषही पूर्ण करीत नसल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे. परवेझ मुशर्रफ यांनी नोव्हेंबर २००७ मध्ये पाकिस्तानात लागू केलेली आणीबाणी घटनाबाह्य़ असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जुलै २००९ मध्ये दिला होता. या निर्णयावरचा फेरविचार करण्यासंबंधी याचिका मुशर्रफ यांनी तब्बल चार वर्षांनी, गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने जुलै २००९ मध्ये दिलेल्या निकालाच्या आधारेच मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या याचिकेत नमूद करण्यात आले.