गुजरातच्या सुरत जिल्ह्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला, यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून तर चार जण जखमी आहेत. सुरत जिल्ह्यातील बालेश्वर गावाजवळ रविवारी हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने टोयोटा इनोव्हा कार रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडकली. इनोव्हामध्ये ११ जण प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या ट्रकला ही कार धडकल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले होते, त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण इनोव्हामधीलच प्रवासी असल्याची माहिती आहे. याशिवाय इन्होव्हातील उर्वरित एका प्रवाशासह ट्रकमधील तिघेजण जखमी आहेत.

मृतांपैकी केवळ तिघांची ओळख पटली असून, मनीष सैन (२२), भारत सैन (४७) आणि वैभव परिहार (२४) अशी त्यांची नावे आहेत.