देशात करोनामुळे यापूर्वी कधीही न बघितलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्णांना बरं करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असून, यात डॉक्टरांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर वैज्ञानिकही करोनावर लस शोधण्याचं काम करत आहे. या दोन्ही आघाड्यांवर काम करणाऱ्या डॉक्टर आणि संशोधकांचं बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. देशात करोनाविरोधातील लढ्यात डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्याचबरोबर करोनावर लस शोधण्याच कामही देशात सुरू आहे. अनेक संस्थामधील संशोधक हे काम करत आहेत. या डॉक्टरांचं बळ वाढवण्याचा प्रयत्न सगळीकडूनच होत असून, बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनीही भारतातील डॉक्टरांचं कौतुक केलं आहे. नसरीन यांनी एक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिक खूप चांगले आहेत. माझी मनापासून अशी इच्छा आहे की, सर्वात आधी भारतानं करोनावर लस शोधावी. जगातील ७.८ बिलियन लोकांना ही लस मदत करेल," अशा आशावादी भावना तसलिमा नसरीन यांनी भारताविषयी आणि भारतातील डॉक्टरांविषयी व्यक्त केल्या आहेत. Indian doctors and scientists are good. I really really want India develops corona vaccine first. And that vaccine will help world's 7.8 billion people. — taslima nasreen (@taslimanasreen) May 31, 2020 करोनावर लस शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल या देशांप्रमाणे भारतातही करोना व्हायरसला रोखणारे प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. भारतात एकूण ३० समूह करोनाचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सहा लस प्रकल्पांवर विशेष लक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्याशिवाय आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या १० वेगवेगळया औषधांचा करोनावरील उपचारांमध्ये वापर सुरु आहे. सध्या ही औषधं चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.जगभरात ५५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोनाची लागण झाली असून ३.५० लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.