दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांनी हाय अॅलर्ट जारी केला असून संभाव्य धोका लक्षात घेता देशभरातील सर्व विमानतळांवरील सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच दिल्लीहून काबूलला जाणाऱया विमानाला दहशतवादी लक्ष करण्याची भीती आयबीने व्यक्त केली आहे. या दरम्यान उड्डाण करणारी विमाने दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरू शकतात, त्यामुळे प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना सुरक्षा यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला असल्याचे वृत्त आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अॅलर्टनंतर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढवली असून कर्मचारी वर्गालाही तपासणी करुनच प्रवेश दिला जात आहे. संशयित व्यक्ती अथवा वस्तू दिसल्यास लगेचच सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आदेश कर्मचारीवर्गाला देण्यात आल्याचे कळते.