अमृतसर येथील रावण दहनाच्या वेळी घडलेली दुर्घटना हा पंजाब सरकारचा निष्काळजीपणा आहे असा आरोप आता भाजपाने केला आहे. इतकंच नाही तर हे कलम ३०४ ए चं प्रकरण आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे कलम या सरकारवर आणि प्रशासनावर का लावू नये? असा प्रश्नही भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी विचारला आहे. या अपघातात जे लोक मारले गेले आणि जखमी झाले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. या घटनेतील मृतांना न्याय मिळालाच पाहिजे अशीही मागणी भाजपाने केली आहे.

 

अमृतसरमध्ये रावण दहन सुरु असताना जमलेले अनेक लोक रेल्वे रुळांवरही उभे होते. या सगळ्यांना चिरडून एक ट्रेन अत्यंत वेगात गेली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला. तर ५१ लोक जखमी झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली.

अरूण जेटलींचाही प्रशासनावर आरोप
पंजाब सरकारने आणि प्रशासनाने काळजी घेतली नाही तर हा अपघात टाळता आला असता अशी टीका अरूण जेटली यांनी केली आहे. रावण दहनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, अशात जर रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी यासंदर्भातली काळजी घ्यायला हवी होती. मात्र त्यांनी याकडे डोळेझाक केली ज्यामुळे हा अपघात घडला असेही जेटली यांनी म्हटले आहे. जर प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असती तर निष्पाप लोकांचे प्राण वाचले असते असेही जेटली यांनी म्हटले आहे.