आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात येरपेडू येथे बाजारात भरधाव ट्रक घुसल्याने २० जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुतलापट्टू- नायडूपेटा या राज्य महामार्गावर पोलीस स्टेशन बाहेर काही जण आंदोलन जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी मालाने भरलेल्या ट्रकवरील ताबा चालकाकडून सुटला आणि तो ट्रक विजेच्या खांबावर आदळला. विजेचा तार तुटून काही जणांना विजेचा झटका लागला. त्यानंतर ट्रकने आंदोलकांना चिरडले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने देखील ट्रकखाली चिरडली गेली. त्यानंतर काही वाहनांनी पेट देखील घेतला. ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर हे दोघे पळून गेले आहेत. सहा जण ट्रक खाली चिरडले गेले तर १४ जण विजेच्या झटक्याने ठार झाले आहेत असे पोलीस अधीक्षक के. एस. नंजनदप्पा यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर येरपेडू, श्रीकलाहस्ती, रेनीगुंटा आणि तिरुपती भागातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. काही जखमींना रुइया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना तिरुपती, वेल्लोर येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलीस दोघांचा चालक आणि क्लीनरचा शोध घेत आहेत.