राज्याच्या अब्रुची लक्तरे निघाली असून आता महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीयमंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केली. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी न्यायालयाला लिहिलेले पत्र गंभीर असून महाविकास आघाडी हे वसुली सरकार बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे. लुटीशिवाय राज्यात काहीही झाले नाही. महाविकास आघाडीला लोकांनी निवडून दिलेले नव्हते. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र हाती घेऊन जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपशी गद्दारी करून सरकार बनवले, असा आरोप जावडेकर यांनी केला.