उत्तर प्रदेशातील आग्राजवळील करमाना गावात १० ते १५ गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

बजरंग दलाने ही घटना उघडकीस आणली. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायी आणि बैलांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठवले. या घटनेमुळे परिसरात तणाव असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘करमाना गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. पण हल्लेखोरांबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबत लगेच प्रशासनाला माहिती दिली’, असे बजरंग दलाचे आग्रा येथील पदाधिकारी मुकेश गोस्वामी यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, असे ताजगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी राजा सिंह यांनी सांगितले.

या वर्षी एप्रिलमध्ये हरयाणातील फरिदाबाद जिल्ह्यातील भोपानी गावातही गायींवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. पिकाचे नुकसान करत असल्याने त्यांना पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनीच गायींवर हल्ला केल्याचे तपासात उघड झाले होते.