उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार)उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या घटनेबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकले.” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकले. सरकारने म्हटले की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिले. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता.” असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

आणखी वाचा- उत्तर प्रदेश : हाथरस येथील गँगरेप पीडित दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

आणखी वाचा- …त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं – जयंत पाटील

पीडित तरुणीने चार तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचं कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केलं होतं. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली.