तामिळनाडूतील मरुमलारची द्रविड़ मुनेत्र कळघम (एमडीएमके) चे प्रमुख  व राज्यसभा खासदार वायको यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.  संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला असल्याचे सांगत, त्यांनी हे देखील विचारले की हिंदीत कोणते साहित्य आहे? तिची काहीच पाळमुळ नाहीत. तर संस्कृत एक मृत भाषा असल्याचेही ते म्हणाले. तसेच  पूर्वी संसदेत विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्यांना पाठवले जात होते. मात्र आज संसदेतील चर्चांची पातळी हिंदीमुळे खालवली आहे. ते केवळ हिंदीत आरडाओरडी करतात. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी देखील हिंदीतच भाषण करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

वायको यांनी जवाहरलाल नेहरू एक महान लोकशाहीवादी होते व त्यांनी क्वचितच कधीतरी संसदेचे सत्र सोडले असेल. मात्र मोदी कधीतरी संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवतात असे म्हटले. तसेच पंतप्रधान मोदी आणि नेहरू यांची तुलना करत नेहरू पर्वत होते तर मोदी केवळ त्याचा एक हिस्सा असल्याचेही ते म्हणाले.